उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन : एक शापित गंधर्व

August 5th, 2008

परवाच बोलताना कुणीतरी म्हणालं, सगळ्या पेट्रोलपंपांचा संप आहे, म्हणून. आणि माझं मन सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात एखाद्या चुकार वासरासारखं ओढलं गेलं. मंडळी, आपलं मन म्हणजे अजब रसायन आहे, बरं का ? कितीही दावणीला बांधलं तरी जिथे जायचं तिथे जातंच. असो, माझ्यापुढे तो हरवलेला काळ उभा राहिला, आणि मन:चक्षूंसमोर प्रतिमा उभी राहिली, ती एक मळकट बनियान, साधारणत: त्याच रंगाचा पायजामा, तोंडात रंगलेलं पान, आणि “अमां मियां, ये गाना वाना तुम्हारे पंडतोंके बसकी चीज नहीं. हमारे बडे अब्बू का गाना सुनो, वो पंडत सब पैर छूते थे उनके.” हे पेटंट वाक्य.

मंडळी, गोंधळलात ना ? पेट्रोलपंपाच्या संपातून हे संगीत वगैरे कसे काय आठवले बुवा ? हा तुम्हाला भेडसावणारा प्रश्न तुमच्या बावळट चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय मला. मंडळी, आपली अभिजात संगीताची परंपरा आहेच तशी थोर. पण उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन, हे ह्या परंपरेचे एक शापित पाईक होते, आणि तसंच अजब रसायन होतं. त्याचं काय आहे, की पेट्रोलंपंप, ग्यास सिलिंडरे, वगैरे आम्हा खेड्यातल्या लोकांनी जेव्हा पाहिली देखील नव्हती, तेव्हा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर “ग्यास एंड ष्टो रिपेर शाप, ७८६” असा हस्तलिखित बोर्ड असलेली एक टपरी होती. त्याखाली “प्रोप्रा. ग्यासुद्दिन शमसुद्दिन” असे खरडलेले होते. आमच्या घरी दोन रॉकेलचे ष्टोव्ह होते. त्यातला एकतरी नेहमीच बिघडलेला असायचा. पण आम्हाला ग्यासुची आठवण यायची, ती दुसराही ष्टो बिघडल्यावर.

“सर्क्या, जा त्या ग्यासूकडून आण ष्टोला पीन मारून, नायतर आज गिळायला काय नाय तुला.” आमची म्हातारी तशी सुगरण. तिच्या हातचा अर्धाकच्चा भात आणि घासलेटचा सुगंध येणारी कढी पिऊन येणाऱ्या ढेकरेची आठवण मला आजही प्रत्येकवेळी पेट्रोल भरताना येते. (ही ढेकर देताना, मी नेहमीच आजूबाजूला विस्तव नाही, ह्याची खात्री करून घेतो.) ष्टोचा पंप आणि माझी पाठ ह्या दोन्ही भगवंताने तिला खास बडवण्यासाठी बहाल केलेल्या वस्तू आहेत, अशी तिची अमाप श्रद्धा होती. त्यामुळे ष्टो दुरुस्ती ताबडतोब व्हावी, म्हणून ग्यासूकडे मी पूर्ण सकाळ घालवत असे.

पण संपाचा काय संबंध ? अजूनही तुमचा चेहरा तसाच बावळट आहे, मंडळी !

अहो, सोपे आहे. घासलेट-पंपांचा संप दर दोन दिवसांतून एकदा असायचा, तेव्हा हमखास घासलेट मिळण्याचे स्थान, म्हणजे ग्यासुद्दिन. दुरुस्तीला आलेल्या ष्टोमधून थोडे थोडे घासलेट ग्यासू बाजूला काढतो, असा एक प्रवाद होता. आणि संप असला, की डब्बल किमतीला विकायचा. काही लोक चांदीचा चमचा चोखत जन्माला येतात, त्यांच्या घरी रॉकेलचे पंपवाले रोज चक्कर मरतात. पण आमचे नशीब असे, की आमच्या ष्टोमधले घासलेट संपायचे, ते नेमक्या संपाच्या दिवशी. आणि मग छोटेसे पात्र घेऊन आम्ही पुन्हा ग्यासूला शरण जात असू.

ग्यासूला ष्टो रिपेर करताना बघणे, किंवा “मियां रुको, अब्बी लाता हूं घासलेट” म्हणून लगबगीने टपरीमागे जाताना बघणे, हे माझ्या बालपणी माझ्या मनावर खोल परिणाम करून गेले. पण त्यापेक्षाही खोल परिणाम म्हणजे, ष्टो रिपेर करताना ग्यासूचे तत्वज्ञान ऐकण्यामुळे झाले. त्याच्या नावापुढे “प्रोप्रा” असल्याने, मला तो प्रोफेसर, प्राध्यापकांपेक्षा काही वेगळा नव्हता. तसे त्याचे खरे नावही ग्यासुद्दिन नव्हते. त्याचे खरे नाव होते “शरीफुद्दिन वल्द शमसुद्दिन वल्द अल्लाउद्दिन वल्द करीमुद्दिन वल्द रहीमुद्दिन.” पण हे सर्व लिहिणे त्या छोट्याशा बोर्डावर शक्य नव्हते. परिस्थितीप्रमाणे आपली जनमानसातली प्रतिमा आपल्याला आपल्या खऱ्या ओळखीपेक्षा वेगळी ठेवावी लागते, हा माझ्या बालपणात मी ग्यासूकडून घेतलेला पहिला धडा. आमच्या छोट्याशा गावात धनिकांकडे नुकत्याच ग्यासच्या शेगड्या येऊ घातल्यावर, त्याचेही रिपेर काम स्वत:ला मिळावे म्हणून शरीफुद्दिनचा ग्यासुद्दिन झाला.

पण ते होणे नव्हते. त्या ग्यासच्या शेगड्या ग्यासूपर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. ग्यासबत्त्या मात्र चिक्कार पोहोचल्या. म्यांटल जळले, की ग्यासूची सर्वांना आठवण यायची. आमची आजी तर त्यांना ग्यासूद्दिवेच म्हणायची. पण असे असले, तरी ग्यासूच्या चेहऱ्यावर मला कधी विषाद दिसला नाही. शिलिंडरातला ग्यास चोरून वेगळा काढता येत नाही, हे कळल्यावर त्याने ग्यास रिपेरिंगकडे ढुंकूनही बघितले नाही. उलट तोंडातील पानाची भरभक्कम पिंक टपरीपासून रस्त्यावर उडवून ते प्रकरण त्याने कधीच निकालात काढले होते.

ग्यासबत्तीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात टपरीसमोर बसून ग्यासूचे रिपेरकाम बघत, त्याच्याकडून आजवर मी जे काही शिकलो आहे, ते कुठल्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात शिकवले, तर आज तरुणांना बेकारीची समस्या भेडसावणार नाही. ग्यासूचे जीवनविषयक तत्वज्ञान, गीत, संगीत, कविता, गझला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या सर्व विषयातले ज्ञान, आणि ष्टो रिपेर, हे सर्व शिकताना कृष्णाला सांदीपनीच्या आश्रमातदेखील इतके चौफेर ज्ञान मिळाले नसेल, ह्याची मला खात्री आहे. ष्टोला वाती चढवताना, यमन आणि शुद्धकल्याण ह्यातला फरक समजवून देताना, ग्यासुद्दिन चा संगीतशिक्षणविषयक दृष्टिकोण किती व्यापक आहे, ह्याची खात्री पटते.

“अब ऐसा देखो मियां, ये तुम्हारे ष्टोमें कितनी वात हय ?”

“१२” मी.

“तो ऐसा समझो, की हमने उनमेसे सिरफ ७ ही वात उपर की, बाकी सब निकाल दी. अब ये वातको सा बोलो. तो ये जलाई, तो बाकी एक के बाद एक जलेगी के नही ? अब जो वात ऊपर है, वोईच जलेगी. बस ऐसेहि है अपना आयमान. अब ये बीच वाली वात को ले जाव नीचे, और उस्के बाजूवाली को करो ऊपर. तो ये कैसे जलेगी. बस वैसे सुदकलियान. दोनो एकही ष्टो की वाती, लेकिन जलनेका आर्डर अलग है.”

मंडळी, भातखंडे पलुस्करांपासून आपल्या संगीतशिक्षणाच्या क्षेत्रातील मोठी परंपरा अशी ष्टोमधून जळणाऱ्या वातींतून पुढे चालू ठेवणारे ग्यासुद्दिन सारखे संगीतशिक्षक मला लाभले, हा मी माझा बहुमान समजतो.

कधीकधी ग्यासूच्या दुकानात ममद्या नावाचा एक दहा-बारा वर्षाचा पोर असतो. “हमारे चच्चीजान के बुवाजानका नाती.” अशी ममद्या ची ओळख ग्यासूने करून दिली असते. ममद्याला आपले अभिजात संगीत आवडत नाही, ही ग्यासूची मुख्य तक्रार. ग्यासूची तोडी सुरू असते, तेव्हा हा पोऱ्या नवीनच कुठलेतरी रफीबिफीचे गाणे गुणगुणत असतो, तेव्हा चिडून एक ष्टो ममद्याच्या अंगावर फेकलेला मी स्वत: पाहिला आहे.

“अमा, ठीक है के गा नही सकते. लेकिन थोडा सुन तो लो ! ये आजके लडके.”

तसे ग्यासुला कौटुंबिक सुख वगैरे मिळत असावे. पण पोटचे पोर नाही, म्हणून कधी कधी ग्यासू खिन्न असायचा. एकदा भलताच खूष दिसला. “शिरनी लो मियां.” मी प्रसाद खाऊन चच्चीजान चे अभिनंदन करायला निघालो. “अरे उस्को मत बोलो, मियां. उधर गावबाहार ग्यासूका चिमत्कार है. अल्लाउद्दिन के जमानेसे हमारी लैन ऐसी टूटी नही थी कब्बी, अब कैसे टूटेगी?” पुढे त्या “चिमत्काराने” गावातील एका धनिकाशी सूत जमवले, आणि लैन तुटलीच.

तसे ग्यासुद्दिनचे दादे परदादे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात आहेत. पण आजही हैदराबादेचे नाव निघाले, की चारमिनारच्या मागे सलीमभाईच्या दम बिर्याणीच्या आठवणीने ग्यासू कळवळतो.

“क्या बताऊ मियां, वो हड्डीभी ऐसी पकती थी, की उस्को चूसते वक्त जैसे वो पंडत चौरासिया की बासुरी के सुर निकलते थे. हमारी बेगम तो छोडो, बडी अम्मीभी ऐसी बिरयानी कब्बी बना नही सकती.”

एकदा मी ग्यासूला भाईकाकांचे “माझे खाद्यजीवन” वाचून दाखवले.

“अमां मियां, ये बम्मन लिखता अच्छा है. ये खाने खिलाने के बजाय और क्या करता है?”

मग मी त्याला “व्यक्ती आणि वल्ली” वाचून दाखवले.

“मियां, बडे होने पर तुम भी ऐसेच हमारे उप्पर लिखना.”

आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.

आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे

August 5th, 2008

आमची प्रेरणास्थाने:

वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता
भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले

बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-)

व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाककृती. येथील सदस्य क्रमांक ८०० च्या खालच्या सर्वांना व्यक्तिचित्रलेखनातली ही गोम कळलेली आहेच. नव्हे, ज्यांना समजलेली आहे, त्यांनी आपल्या मोलकरणी, मावशा, आत्या, प्राध्यापक, विद्यार्थिनी, ह्या सर्वांची व्यक्तिचित्रे लिहून आपापली खर्जनशीलता दाखवलेली आहेच. आता उरले सदस्य क्रमांक ८०० च्या पुढचे (अडाणी) सदस्य. त्यांना सदर वैविध्य आपल्या लेखनात दाखवता यावे, ह्यासाठी हा लेखनप्रपंच.

तर, खमंग व्यक्तिचित्राची पाककृती अशी:

१. (पहिल्यांदा) एक व्यक्ती निवडावी. हे लिहायला सोपे जाते, पण व्यक्तिचित्राची खमंगता ५०% ह्या व्यक्तीच्या निवडीवरच अवलंबून असते. ही व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखी सामान्य (किंवा क्षुद्र) नसावी. म्हणजे, ह्या व्यक्तीत काही गुण असावेत, जे हल्ली दिसत नाहीत, ते. आता समजा, तुम्हा-आम्हापैकी कुणाची निवड आपण केली, तर ह्या युगात जगणारे, म्हणजे सामान्यच, म्हणून ह्या व्यक्तीचित्राला फारसा प्रतिसाद लाभणार नाही. तुमची एखादी जुनी आत्या आहे का ? बालपणीचा काळ सुखाचा सारख्या भाजणीत तिचा एखादी डाळ म्हणून समावेश होऊ शकेल का ? नाही ? ते सोडा. तुम्ही एखाद्या चाळीत राहात होतात का ? असल्यास तिथे ह्या आत्या-मावश्यांसारखे स्पेसिमेन्स बरेच सापडतात. असे कुणी तुम्हाला माहिती आहे का ? लहानपणी जरी त्यांचा वाईट्ट राग येत असला, तरी ह्या वयात नक्कीच त्यांच्या काही तरी गुणांवर तुम्ही नक्कीच लिहू शकाल! आजकालच्या तरुण-तरुणींनी ह्या आत्या मावशा पाहिलेल्या नाहीत, हे छातीठोकपणे सांगतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली ह्या चित्रातून, तरी पुरेसे आहे. (आणि आईची आठवण म्हणजे, काय सांगू महाराजा ? प्रत्येकाकडून एक तरी प्रतिसाद नक्की! तुमचा लौकिक संवेदनशील लेखक म्हणून, किंवा पुलंनतर तुम्हीच म्हणून होणार ! जियो !)

पण तुम्ही चाळीत राहात नव्हता, कुठल्याही आत्या-मावशांशी परिचय नाही ? नो प्रॉब्लेम ! तुम्ही स्वत:ला कुठल्या कलांचे रसिक समजता ? संगीत ? मग कोपऱ्यावरचा कल्हईवाला आपल्या भसाढ्या आवाजात गातोय ना ? अहो, तोच तुमचा व्यक्तिचित्राचा क्याण्डिडेट ! (मात्र, त्याचे व्यक्तिचित्र लिहिताना, त्याला शापित यक्ष, गंधर्व, किंवा अप्सरा म्हणायला विसरू नका.) तुम्हाला चित्रांमध्ये गती आहे का ? नाही, गती असणे आवश्यक नाही. मधुबालाचे चित्र क्रेयॉन ने ट्रेस केले आहे ना तुम्ही ? मग आहेच की तुम्हाला गती ! आता, पहिले एक काम करा. इतर लोक जेव्हा त्यांची चित्रे प्रकाशित करतात, तेव्हा “भिवया जमल्या नाही”, “नाक थोडे तेढे आले आहे” असे प्रतिसाद देत चला. म्हणजे, तुम्हाला चित्रकलेत गती आहे, अशी लोकांची समजूत होईल, आणि मग तुम्ही बाजूच्या फुटपाथवर रांगोळीने चित्र काढणाऱ्या युसुफचे व्यक्तिचित्र चितारण्यास मोकळे !

तुम्हाला हेही जमत नाही ? अरेरे ! मग सर्वात सोपा उपाय ! तुम्ही शाळेत शिकला असालच ! तिथले छड्या मारणारे शिक्षक आताही आठवत असतीलच ! मग कामच संपले. त्यांच्या छड्यांची आठवण “आमचे साने गुरुजी” ह्या नावाने लिहा. सगळ्यांना जाणीव होईल त्यांच्या हरवलेल्या बालपणाची. बालपणीचा काळ, जसा तुमचा छड्या खाऊन सुखाचा गेला, तसाच आज आमच्या मुलांचा का जात नाही, असे अनेक प्रतिसाद येतील. तुमचे व्यक्तिचित्रक म्हणून काम संपले.

असो, तर सांगायचे एवढेच, की पुढे व्यक्तिचित्रणासाठी मदत होईल म्हणून, आजच आपल्या आत्या मावश्या, कोपऱ्यावरचे कल्हईवाले, रांगोळीचे चित्रकार, आणि जुने शिक्षक, ह्यांच्यावर लक्ष ठेवून असा. वेळ काय सांगून येते ?

२. (आपल्याच ग्यासवर) आपल्या व्यक्तिमत्वाशी त्या व्यक्तीची जुळवाजुळव करावी. हे महत्वाचे. कारण मी लिहितो मुक्तके, आणि आत्या करते ओव्या. तिचे नि माझे कसे जमणार ? मी जर अभिजात, तर तीही अभिजातच असायला हवी. मी जर चित्रकार, तर तिनेही किमान रांगोळी तरी काढलेली असायला हवी. मी जर मटण खातो, तर तिलाही मटणाची गोडी लावायला हवी. नाहीतर मग मटण खाताना छायाचित्रे कशी देणार?

३. (चिमूटभर) भाईकाका. हा एकच शब्द लक्षात ठेवा. ह्यांचे पाळण्यातले नाव पुलदेशपांडे. पण हल्ली, हे भाईकाका ह्या नावाने ओळखले जातात. नव्हे, “पुलं” म्हटले की म्हणणारा भोटम ठरतो. त्याचे काय आहे, ह्या लेखकाने अनेक व्यक्तिचित्रे लिहिली असे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे, हा शब्द आला, की भलेभले नरम होतात. विशेषत:, एकदा तुमच्यामागे “भाईकाकांची शैली” असे कुणी लचांड लावले, की तुम्ही वरच्या पातळीवर पोहोचलात, असे समजा. हे सोपे नाही बरे का मंडळी. ह्यासाठी अनेक वर्षांची तपस्या लागते. काही डॉ. वगैरे लोकांचे प्रतिसाद आवश्यक असतात. परंतु, एकदा हे झाले, की मग मात्र तुम्हाला मरण नाही. हे एकदा झाले, की दुनिया फाट्यावर मारायला तुम्ही मोकळे.

४. (चवीप्रमाणे) छायाचित्रे. व्यक्तिचित्र लिहायचे म्हटले, की मग त्याला “जेन्युईन” बनवण्यासाठी आवश्यक अशी छायाचित्रे आपल्याला मिळवून ठेवणे आवश्यक आहे. हल्ली ही नवीन पीढी छायाचित्रांशिवाय कुठल्याही व्यक्तीचित्रावर विश्वास ठेवण्यास नकार देते. अगदी कुणाच्याही पाठीवर साबण चोळले, तरी ती उघडी पाठ छायाचित्रात दाखवली नाही, तर हे तरुण आजकाल विश्वासच ठेवत नाहीत. हल्लीच्या पीढीला विश्वास ही गोष्ट कशाशी खातात ते माहिती नाही. (असो, त्याविषयी नंतर कधी तरी.)

५. (भरघोस) नर्म विनोद. आपण व्यक्तिचित्रणात जे काही अगम्य अगोचर लिहिलेले आहे, त्यावरचा अविश्वास नाहिसा करणे, ह्यासाठी अधून मधून नर्म विनोद करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे सर्व सत्यच आहे, आणि गीतेवर एक हात ठेवून आपण दुसऱ्या हातावे टंकन करीत आहोत, असे वाटेल. त्यामुळ अधेमधे नर्म विनोद आलेत, की नव्या लोकांना वाटते, की आपण विनोदी लिहितो आहे, आणि जुन्या लोकांना वाटते की ही भाईकाकांची शैली. दोन्हीकडून टाळ्या पडतात. हे खरे, की खोटे, ते बिंग आपण बिंगच ठेवावे, फोडू नये.

६. (थोडी) गुप्तता. जरी आपण एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असलो, तरी त्या व्यक्तीविषयी सर्वच काही उघड करू नये. नाही तर, ही व्यक्ती आपल्यासारखीच सामान्य आहे, असे इतर सामान्य वाचकांना वाटते. आणि मग त्या व्यक्तिचित्रणाचा काय उपयोग ? श्री. भीमराव मेश्राम, ही व्यक्ती दिवसा दगड फोडते, म्हणून त्या व्यक्तीच्या कपाळावरील घर्मबिंदू कळफलकबडव्यांना आवडतात. संध्याकाळी घरी गेल्यावर इंटरनेटवरून बिपाशाची चित्रे बघताना, ह्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या घर्मबिंदूंविषयी कुणाला सहानुभूती वाटणार ?

७. (उकळताना) आपली एकाग्रता. आपण उगाच कधी कविता, कधी गझला. कधी वैचारिक लेख. कधी तंत्रज्ञानाविषयी. असे लेखन केले, तर व्यक्तिचित्रलेखक म्हणून आपली ख्याती विरणार. व्यक्तिचित्रांव्यतिरीक्त फारतर एखादा दुसरा विषय आपण हाताळायला हवा. दुसरे काहीही नाही. विशेषत: आपण ज्या विभागातली व्यक्तिचित्रे जास्त करून लिहितो, तोच विभाग आपण सांभाळायला हवा. इतर विभागात लेखन करण्यास आपण इतर लेखकांना उद्युक्त करायला हवे. स्वत: मात्र इतर ठिकाणी चोच देखील मारू नये. कारण असे केल्यास आपली प्रतिमा, ही “वैविध्यपूर्ण लेखक” अशी होते. ही भूमिका आपल्या व्यक्तिचित्रकाराला मारक आहे, हे लक्षात ठेवावे. जगात वैविध्यपूर्ण लेखक बरेच आहेत, त्यांना आपण “एक ना धड भाराभार चिंध्या” असे दूषण देऊ शकतो, पण आपली व्यक्तिचित्रकार अशी प्रतिमा ढासळल्यास आपल्या मदतीला हे वैविध्यपूर्ण येड*वे येणार आहेत थोडेच ?

जालकवींच्या कविता: आवाहन

August 4th, 2008

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी कसे असावे, ह्याबद्दल विचारमंथन करीत असताना, एका कार्यक्रमाची कल्पना सुचली, आणि ती संयोजकांना कळवली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, म्हणून हे आवाहन.

कार्यक्रमामागील भूमिका: विश्वजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. चलचित्रांच्या बाबतीत यू-ट्यूबने क्रांती घडवली. छायाचित्रांत फ्लिकरने. मुद्रित साहित्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमुलाग्र परिवर्तन जरी दिसत नाही, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. मराठीचे हेच भविष्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्हे, ह्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ह्या नवीन युगातले स्वत:चे अस्तित्वच नाहीसे करणे. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेखा: एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. हेच नाही तर, काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील “प्रोफेशनल” नसतील.

मदत हवी आहे: हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही सर्व “जालकवींना” आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला ईमेलने पाठवा ! (इमेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा, आणि कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी.) जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती. तसेच ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.

मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)
चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)

([dot] ऐवजी “.”, आणि [AT] ऐवजी “@” वापरावे.)
धन्यवाद !

माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार)

July 7th, 2008

(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार, हे नक्की. आमच्या ह्या महत्वाकांक्षेला आजवर एकमेव आव्हान होते, ते येथील, म्हणजे बे एरियातील स्वघोषित साहित्यिकांचे. पण “कला” ह्या मराठी साहित्यप्रेमीच्या जगातील एकमेव संस्थेने सदर साहित्य संमेलनाला दर्शवलेला विरोध लक्षात घेता, आमचा अध्यक्षपदाचा मार्ग खुला झाला, आणि आम्ही भाषण लिहायला घेतले. त्यातील काही अंश आगाऊपणे - म्हणजे ऍडव्हान्स ह्या अर्थाने - आम्ही येथे मांडतो आहोत.)

मैत्रहो,

बे एरियातील वादग्रस्त ठरलेल्या ह्या साहित्य संमेलनात आपले स्वागत आहे. आणि का नसावे ? संमेलनापूर्वीच्या चर्चांतून असे वाटले होते, की एकूण फक्त १५३ साहित्य प्रेमी ह्या संमेलनाला हजेरी लावतील. पण दोन साहित्यप्रेमींनी आपापल्या बायकांना पण सोबत आणले आहे, त्यामुळे १५५ रसिकांची उपस्थिती लाभून ह्या साहित्यसंमेलनाला घवीघवीत यशच प्राप्त झाले आहे. लॉस एन्जेलिस आणि सॅन डियेगो भागातून फक्त ८ जण येतील असे वाटले होते. पण नंदन आणि डांबीसकाका ह्यांनी नंदिनी आणि डांबिसकाकूंना (अनुक्रमे, उगाच घोळ नको) येथे आणले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करू या, असा ठराव मी मंाडतो.

(ठाले पाटील अवतरेंच्या कानात: फुडच्या वर्षी ड्यांबीसला अद्यक्ष करनार, म्हनून तू म्येल पाटवली, त्ये येक ब्येस केलं.)

मैत्रहो, आपल्या लक्षात आलेच असेल, की मी आपल्याला मैत्र म्हणून संबोधतो आहे. नेहमीप्रमाणे “मित्र-मैत्रिणींनो” असे नाही. ह्याचे मूळ कारण की आपण बे एरियात आला आहात. इथे मित्र आणि मैत्रिणी हा भेदभाव आम्ही करत नाही. संत फ्रान्सेश्वराच्या ह्या नगरीत ह्या क्षुल्लक लिंगभेदाला स्थान नाही. बाया-बायांची आणि बाप्या-बाप्यांची यथासांग लग्ने लावून देण्यात ही नगरी प्रसिद्ध आहे. इथे आजकाल लग्नाच्या सरकारी अर्जावर नवरा आणि बायको अशी नोंद नसते, तर अशील क्र. १ आणि अशील क्र. २, असे लिहून जागा सोडलेली असते. (स्वत:चे शील न सांभाळणारे, ते अशील ही कोटी आपल्यातले काही गंभीर असे विनोदी साहित्यिक करतीलच. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही दुसरे काय ?)

मैत्रहो, आपले साहित्यक्षेत्र ही नवीन सामाजिक परंपरा कधी आणि कशी जवळ करणार, हा आम्हाला सध्या छळणारा मुख्य प्रश्न आहे. आजवर आपल्या मराठी ह्या प्रगल्भ भाषेत समलिंगी संबंधांना स्वीकारणारे एकही लिखाण झालेले नाही. दिवसाला एक, ह्या दराने प्रेमकविता पाडणाऱ्या आपला कविवर्ग (विशेषत: कवयित्रीवर्ग, ह्यांना अशा कविता पाडायला बराच वेळ मिळतो) ह्या दुसऱ्या नाजुक नात्याविषयी काहीच कसे लिहीत नाही ? मैत्रहो, आज ह्या वाटमोड्या (पाथब्रेकिंगला कुणी मराठी शब्द सुचवा हो) साहित्यसंमेलनात आपण प्रतिज्ञा करूया, की आजपासून आपले कुठलेही मराठी साहित्य लिंगभेद करणार नाही. जुने जाऊ द्या तिकडे (जिकडे सगळे जुने जाते, तिकडे.. त्या प्राण्याच्या पार्श्वभागातील त्या विशिष्ट अवयवाचा जाहीर उल्लेख करणे फक्त विद्रोही साहित्य संमेलनातच शक्य आहे.) आजपासून आपण माझ्या लिंगसमतेच्या चळवळीला हातभार लावावा, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे.

ह्यासाठी जुन्या साहित्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. आता तांब्यांचीच कविता घेऊ या, आणि तिला लिंगसमतेच्या चळवळीत आणू या. म्हणा तर माझ्या मागून.

व्यक्ति व्यक्तिची सलज्ज कुजबुज
झाडाझुडपांचे हेच मधुर गुज…
(”वृक्षलता” हे भिन्नलिंगत्वाचा पुरस्कार करणारे असल्याने मुद्दाम बदललेले आहे. साहित्यिकांनी लिंगसमतेवर छुपेपणे केलेल्या अशा प्रहारांविषयी जागृत असावे.)

भटांच्या गझलांना लिंगसम करणे खूप सोपे आहे.

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे

हे पुरुषाने म्हटले, की झाले. किंवा

पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली..

हेदेखील ह्या थोर नगरीतील एखाद्या पुरुषाने गायले, तरी पर्फेक्ट!
(विशेषत: ह्यातील “रेशमाची” हा उल्लेख आमच्या बे एरियातील निसर्गोत्पादित वस्तूंविषयीचे प्रेम व्यक्त करणारा आहे, त्यामुळे आमचे त्याला अनुमोदन आहे. पुढचा मुद्दा बघा.)

मैत्रहो, आमच्या बे एरियातील संवेदनशील मनामनाला भिडणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कृत्रिम वस्तूंविषयी असणारा द्वेष. येथे कुणी झाडे तोडणार, असे म्हटले, की आम्ही त्या झाडांवरच ठाण मांडून बसतो. “कला”च्या पत्रकामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या बर्कली ह्या विद्यापीठात आम्ही असेच केलेले आहे. तेथील क्रीडावास्तूसाठी १०-१५ झाडे तोडणार असे ऐकल्याबरोबर आम्ही संवेदनशील मंडळी त्या झाडांनाच आमचे घर केले. निसर्गाशी सान्निध्य साधून वैश्विक तापवृद्धी टाळण्याचा ध्यास घेतलेले श्री. ऍलराव गोरे पाटील हे आडनावाने मराठी आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

आज आपण दुसरी एक प्रतिज्ञा करू या, की आपले सर्व लिखाण हे निसर्गाशी एकात्मता साधणारे हवे. आपण आजवर आपल्या लेखनातून नैसर्गिक एकात्मतेला फाटाच दिलेला आहे. नायिकेने घातलेला शिफॉनच्या सूटचे वर्णन करताना, त्यात नैसर्गिक कापसाचे प्रमाण किती आणि प्रयोगशाळेत घडवलेल्या रसायनांचे प्रमाण किती, हे आपण लिहायचे टाळतो. अगदी हेच बघा ना, एकेकाळी साहित्यिक म्हणून गणले जाणारे पुलंदेशपांडे ह्यांनी देखील (सुनीताबाईंचा धाक, आणि बाबा आमट्यांशी ओळख असूनही) कधीही ही नैसर्गिक एकात्मता त्यांच्या लिखाणात दाखवलेली नाही. मी फक्त एक उदाहरण देतो. त्यांनी स्वत: खाल्लेल्या विविध पदार्थांचे वर्णन करून (इतर लोकंाना जळवावे ह्या दृष्टिकोनातून) “माझे खाद्यजीवन” असा लेख िलहिला होता. पण त्यांनी खाल्लेल्या पदार्थांत नैसर्गिक घटक (ऑर्गॅनिक) किती, मेदजनक, कर्बजनक घटक किती, ह्याचा उल्लेख न करणे ही अक्षम्य हेळसांड केली. मैत्रहो, बे एरियातील ह्या नवीन युगात आपल्याला हे करून चालणार नाही. अगदी कुणा साहित्यिक मित्राकडे (तो पुणेरी नसल्यास) “चहा घेतला”, असे लिहिले, तरी लगेच त्यात दूध किती (२% मेद, की १%, ऑर्गॅनिक की नाही) साखर आणि कर्बघटक किती, हे लिहिणे आवश्यक ठरते.

मंडळी, मागे उल्लेख केल्याप्रमाणे ऍल गोरे पाटील हे आमच्या बे एरियाचे वाग्दत्त जावईच आहेत. त्यांनी आम्हाला दिलेली दुसरी शिकवण म्हणजे पेट्रोल वाचवणे. शक्य असल्यास पेट्रोलचा वापरच न करणे. मैत्रहो, आपल्या आदरणीय ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी वारंवार स्कूटर ह्या वाहनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केलेला आहे. (कारचा उल्लेख मराठी साहित्यात केला की ते अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण ठरते.) सदर वाहन पेट्रोल पिते, ह्यामुळे भविष्यातील साहित्यात (म्हणजे आमच्या बे एरियातील तीन साहित्य रसिकांनी आपले साहित्य वाचावे असा आपला आग्रह असेल, तर) अशा पेट्रोल पिणाऱ्या वाहनांचा उल्लेख टाळावा. आपल्या नायक-नायिकांना (किंवा नायक-नायकांना, किंवा नायिका-नायिकांना) चालत किंवा दुचाकी सायकलवर प्रणयक्रीडा करण्यास पाठवावे. ह्या पात्रांतील कुणीही एक जर धूम्रपान करीत असेल, तर दुसऱ्या पात्राने ते हाणून पाडावे. ह्यातील कुणी जर कर्बवायू सोडत असेल (कदाचित दोघेही) तर त्यांना दिवसा झाडाखाली बसवावे, आणि रात्री मरणपंथी धाडावे (रात्री मानवजात प्राणवायू भक्षण करते, आणि त्यामुळे झाडांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही, ह्या समस्येवर ऍल गोरे पाटील ह्यांनी सुचवलेला हा उपाय आम्ही आपणास सुचवीत आहोत.)

पुढच्या रांगेत बसलेल्या सर्व साहित्यिकांच्या चेहऱ्यावरची नाराजी येथे आम्हाला स्पष्ट दिसते आहे. मुळात पुस्तके छापली जातात, तीच झाडांची पृष्ठे करून, हे मतही मला येथे त्यंाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. परंतु माझ्या प्रिय साहित्यिकांनो, सारखी सारखी पुस्तके प्रकाशित करून तुम्ही झाडांची ही दुर्दशा करताहात, ती पापे किती दिवस स्वत: झेलणार ? काही प्रकाशकंावरही सोपवा की ! तुमची पुस्तके छापून छापून स्वत:च्या अर्थप्राप्तीसाठी अनेक झाडांची दुर्दशा करणारे हे प्रकाशक आज बे एरियातील साहित्यसंमेलनात, तिकीटाचे पैसे नसल्यामुळे हजर राहू शकलेले नाहीत. (तुम्हाला द्यावयाची रॉयल्टी इतके दिवस बुडवूनही त्यांच्याकडे अद्याप अमेरिकेच्या तिकिटासाठी पैसाही जमलेला नाही. पण हे प्रकरण तुम्ही आणि प्रकाशक एकमेकात निपटवा.) निसर्गाची अवकृपा त्यांच्यावर झाली आहे, हे त्याचे मूळ कारण.

येथे जमलेल्या १४८ साहित्यप्रेमी आणि ७ साहिित्यकांना आम्ही विनंती करतो, की मराठी साहित्याचा वटवृक्ष जर बे एरियातील मातीत रुजवायचा असेल, तर बे एरियातील मूळ तत्वांशी मराठी साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. नुस्ते महाराष्ट्र मंडळाने साहित्याची गोडी बे एरियात रुजवायला हवी, अशा किती दिवस बोंबा मारणार ?

आज आपल्याला प्रोत्साहन आणि दिशादर्शन म्हणून आम्ही आमचे तरुणपणीचे आवडते लेखक श्री. ना. सी. फडके, ह्यांचा एक उतारा लिंगसमभाव-निसर्गेकरूपता-वैश्विक-तापवृद्धीविरोध ह्या बे एरियातील तीन तत्वांशी समरूप करून आपला निरोप घेतो.

“सुहास आणि किरण निसर्गविज्ञानाच्या महाविद्यालयातील प्रांगणात बसले होते. सुहासची सायकल जवळच्याच झाडाला टेकून ठेवली होती. त्या झाडाला सायकलची सीट (वाळलेल्या मक्याच्या पानांपासून बनवलेली) टोचू नये म्हणून सुहास काळजीत होतं. (कुठल्याही क्रियापद अथवा नामातून लिंग प्रकट व्हायला नको, बरं का साहित्यिकांनो?) किरण आज महाविद्यालयातील सर्व भाषणं ऐकून कंटाळलं होतं. ते सुहासला म्हणालं, “आज मला कुठेतरी छान सायकलने फिरायला जावंसं वाटतं. सुहासला दोन महिन्यापूर्वी घरातलं सर्व शिळं अन्न टाकून तेनं केलेलं काम्पोष्ट किती सडलं आहे, ते बघायला जायचंच होतं. ते किरणला म्हणालं, चल माझं काम्पोष्ट बघायला जायचं का ? किरणला तेच्या सर्व अंगावर टिंगल व्हायला लागलं. (हे इंग्रजीतलं टिंगल बरं का ? मराठीतलं नाही. हा खास बे एरियातील मराठी तरुण-तरुणींसाठी आपुलकीचा टच.) आपल्या प्रियासीकराचं (प्रियकर की प्रेयसी हे किती खुबीने टळलं आहे बघा. अशा नवीन शब्दांची आज मराठीला गरज आहे. अधिक माहितीसाठी गूगलवर शब्दभांडारचा शोध घ्या) काम्पोष्ट बघायला कुणाला आवडणार नाही? सुहास लगच किरणला तेच्या सायकलवर डबलशीट बसवून काम्पोष्टवर गेला. तिथला दुर्गंध किरणला अधिक टिंगल करू लागला. सुहासचाच हा गंध, असं किरणला वाटलं. किरणने सुहासकडे सहेतुक पाहिलं. सुहासने किरणकडे. किरण स्वत: काम्पोष्ट का नाही करत? सुहासचं मन थरारलं. किरणच्या टीशर्टावर हळू हळू सहेतुक हात फिरवत सुहासनं शेवटी तो प्रश्न टाकलाच. “छे, काहीतरीच तुझं, सुहास! काम्पोष्टात टाकायला शिळं अन्नंच नाही माझ्याकडे. होल फूड्स मधून एकदा अन्न आणलं की ते आठवडाभर पुरतं. कालंच सगळ्या ऑर्गॅनिक बटाट्यांत ओर्गॅनिक सैंधव मीठ टाकून जेवलंय मी. अजूनही त्या पादे-मिठाचा वास माझ्या टीशर्टला आहे.” सुहासला किरणविषयी धन्य वाटलं. दोघांची नजरानजर झाली. सुहासचे पुढे आलेले वाळलेले ओठ किरणला हवेहवेसे वाटले (कारण ते पूर्ण वाळलेले होते, उगाच इतरांसारखे रसायने लावून ओले केलेले नव्हते.) आणि दोघेही निघाले सॅन फ्रॅन्सिस्कोला. आज तिथला रजिस्ट्रार लग्ने लावायला ओव्हरटाईम करणार होता.”

हाण तिच्या मॉमला (अर्थातच, बे एरिया मराठी लिटरेचर कन्वेन्शन)

July 3rd, 2008

काय सांगू महाराजा, गेले काही दिवस आम्ही मोरपिसांपेक्षा तलम आणि हलके होऊन साहित्यजगतातील मुष्टियुद्धाच्या रिंगणात बागडतोय. जेव्हा आम्हाला फेब्रुवारी २००९ मधील मराठी साहित्य संमेलन संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात (मराठीत ज्याला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया म्हणतात) होणार हे कळले, तेव्हापासून मुहम्मद अलीच्या शिकवणीतून आम्ही फुलपाखरासारखे बागडतोय, परंतु मधमाशीसारखा चावा घ्यायची संधी इतक्या लवकर चालून येईल असे वाटले नव्हते.

आता, वरील मराठीप्रचुर वाक्य लिहिताना आम्हाला एवढे हलके व्हायला काही अमराठी पाश्चिमात्य द्रव्यांची (की द्रवांची) मदत झाली, हे कबूल करतो. यापुढील वाक्यांना देखील सदर द्रवाची मदत व्हावी ही सरस्वतीचरणी प्रार्थना.

तर, आम्ही सदर उपसागरीय भागात वास्तव्य करून आहोत. येथील दक्षिणी उपसागरीय प्रांतातील महाराष्ट्र मंडळ नामे मुष्टियुद्धाच्या रिंगणाच्या अगदी जवळच्या जागा आम्हाला लाभल्या आहेत. ह्याचे कारण की आमचे एक जवळचे मित्रच सदर रिंगणाच्या चालकसमितीवर आहेत. आणि तरी देखील सदर साहित्य संमेलन ह्या समितीने स्वत:वर ओढवून घेतलेले आहे, हे आम्हास महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ ह्या वृत्तवाहिन्यांतून कळले. (ह्याविषयी आम्ही सदर सदस्याजवळ आमची खंत व्यक्त केली आहेच.)

पण जेव्हा सदर वृत्त आमच्या वाचनात आले, तेव्हा आम्हाला अतोनात आनंद जाहला. आणि आम्ही सदर संमेलनाला आमचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला. (आमच्या जवळच्या मित्राच्या भीतीमुळे नव्हे, हे येथेच नमूद करू इच्छितो.) पण नुकतेच ह्या दक्षिणी उपसागरीय भागातील कला आणि साहित्य ह्यांना वाहून घेतलेल्या (म्हणजे काय कोण जाणे) एका कला नावाच्या संस्थेचे प्रसिद्धी पत्रक आमच्या वाचनात आले. त्यांना हे साहित्य संमेलन सदर उपसागरीय भागात काय तर कुठेच व्हायला नको आहे, असे दिसते. कारण येथे हे संमेलन होऊ नये, ह्याचे कला ह्या संस्थेने दिलेले मुख्य कारण असे, की जी संस्था (महाराष्ट्र मंडळ) हे संमेलन आयोजित करते आहे, त्यांनी आजवर मराठी साहित्याच्या सदर भागातील उत्थापनासाठी काहीही केलेले नाही. (ह्या उलट सांगलीला गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनानंतर मराठी साहित्यप्रेमींची संख्या अतोनात वाढली असून, तेथील मराठी पुस्तकांच्या दुकानदारांनी सध्या वॉरेन बफेटला मागे टाकले आहे, असे आमचा बातमीदार कळवतो. यंदाही रत्नंाग्रीचे लेले-वाचनालय चालवणारे लेले काका-काकू सध्या बाजूच्या नेन्यांना कुठले मर्सिडीजचे मॉडेल जास्त जळवेल ह्याची काळजी करताहेत.)

ह्या मुद्द्याबाबत आम्ही सदर पत्रकाचे लेखक आणि सदर संस्था ह्यांच्याशी अगदी सहमत आहोत. मराठी साहित्याच्या उत्थापनासाठी ह्या उपसागरीय विभागात महाराष्ट्र मंडळाने जे करणे अपेक्षित होते, ते अजिबात केलेले नाहीये. नुस्ते लोकांना आवडेल ते करून साहित्याची गोडी कशी वाढणार? नाही म्हणायला २००३ साली कला ह्या संस्थेच्या दोघा कलाकारांनी महाराष्ट्र मंडळाच्या एकांकिका संमेलनात घडवलेली “एक उलट, एक सुलट” की अशीच काहीतरी एकांकिका अनेकांची साहित्यविषयक अभिरुची वाढवून गेली. पण ती त्या चार तासांपुरतीच. नंतर सगळ्या प्रेक्षकांनी मिडलफिल्डच्या कबर्ली थेटरातल्या बाथरूममध्ये चुळा भरल्या, आणि पुन्हा जैसे थे झाले.

कलाने पण अशाच काही एकांकिका प्रकाशून प्रेक्षकांना चुळा टाकायला लावले आहे. पण त्यांचे लक्ष्य मात्र नेहमीच साधले आहे. प्रेक्षकांना आवडो की न आवडो, साहित्याची सेवा झाली की झाले, काय ?

असो, पण कला ह्या संस्थेचे पत्रक वाचल्यानंतर आम्ही प्रचंड खजील झालो. ह्या दक्षिण उपसागरीय भागातील साहित्यातील दिग्गजांचे म्हणणे ऐकून न घेताच आम्ही आमचे मत व्यक्त केले, ह्याबद्दल आम्हाला खेद झाला. आम्हाला साहित्यातले शष्प देखील कळत नाही, ही आम्हाला आधीच असलेली जाणीव पुन्हा एकदा झाली. (आम्ही लहान होतो, तेवहा अकोल्याला भरलेल्या साहित्य संमेलनात आमची एका असाहित्यिक विठ्ठल वाघ नावाच्या वऱ्हाडी कवीने केलेली तारीफ सदर कलाप्रेमींच्या साहित्यसेवेपुढे अगदीच कमी पडते. गोनीदा -ह्यंानी तळेगावच्या त्यांच्या घरात आमच्या बाल-कवितांची तारीफ केली होती-, हे तर तद्दन लोकप्रियतेच्या मागे धावणारे लेखक. त्यांना “एक सुलट, एक उलट” ची साहित्यसेवा कशी कळणार?)

असो, पण आम्ही सदर संमेलनाला पाठिंबा देताना व्यक्त केलेली कारणे आम्हाला येथे देणे आवश्यक आहे.

आम्ही व्यक्त केलेली कारणे अशी:

१. मूळ महाराष्ट्रात निवृत्त झालेल्या लोकांना म्हातारपणी आपले जुने प्रेम पुनरुज्जीवित करण्यासाठी साहित्य संमेलनांचा उपयोग होतो, असे सांख्यिकी सांगते. हे लोक पुढच्या २० वर्षांत दिवंगत होणार. मग त्यापुढे मराठी साहित्याचे काय ? तरुणांना त्यांची लग्ने जमवण्यासाठी आजवर ह्या साहित्य संमेलनांनी काय केले आहे ? सदर तरुण-तरुणींना लग्ने जमवण्यास मॅकडॉनाल्ड्स, पिझा हट ह्या संस्थांनी साहित्य संमेलनांपेक्षाही अधिक योगदान दिले आहे, असे आमचा भारतातील वार्ताहर कळवतो. (नाही म्हणायला आमच्या परिचयातील एका कला-प्रेमीने.. पण ते जाहीर करायला नको.)

२. सदर संमेलन इंदूर वगैरे ठिकाणीही झाले आहे, असे कळते. तेथील साहित्यिक पुणे-३० ची अधिकृत मराठी न वापरता, हिंदी नावाच्या भाषाभगिनीकडून बलात्कारित कुठलीतरी भाषा वापरतात असे ऐकिवात आहे. इंदूरला जेव्हा साहित्य संमेलन होऊन राहिले होते, तेव्हा सारे रसिक चांगले कपडे पेहनून, इतर रसिकांच्या कपड्यांकडे पाहून राहून, “अपन वोईच घातले असते, तर?” अशा संभ्रमात पडून राह्यले होते, असेही ऐकिवात आहे.

३. सदर साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट संमेलन स्थळाजवळच्या विद्यापीठांतील प्राध्यापकांमध्ये मराठीची आवड निर्माण करणे आहे, असे आम्हाला ह्या उपसागरी क्षेत्रातील मराठी संस्कृतीचे जपणूककार कलाच्या पत्रकातून कळले. सदर पत्रकात, स्टॅनफोर्ड आणि बर्कली ह्या दोन विद्यापीठांचा उल्लेख केलेला आहे. सर्वप्रथम, संत फ्रान्सेश्वर उपसागरीय विभागात फक्त ही दोनच विद्यापीठे आहेत, हा आभास निर्माण केल्याबद्दल कला ह्या संस्थेचा आम्ही निषेध करतो. सॅन होजे सिटी कॉलेज, किंवा २८० वरून स्पष्ट दिसणारी नॅशनल युनिवर्सिटी कलाप्रेमींना दिसू नये, हेही एक नवलच. तरी बरे, हे कलाप्रेमी दर शुक्रवारी कलेच्या संवर्धनासाठी २८० वरून एव्हरग्रीन भागात बैठकीत बसायला जात असतात. (बैठक ह्या शब्दाला हल्ली साहित्यिक भारतात दारूचे साहचर्य प्राप्त झाले आहे. पण कलेच्या संवर्धनासाठी सदर उपसागरीय भागात ज्या बैठका होतात, त्यांना अशी दारूची काळी किनार नसते, बरे का साहित्यप्रेमींनो! - अरे सगळे साहित्यप्रेमी कुठे निघालात ? खऱ्या कलाप्रेमींना आणि साहित्यप्रेमींना बैठकीचे असे अदारू-स्वरूप सहन होणार नाहीच, म्हणा. चालेल, तेवढाच महाराष्ट्र मंडळाचा खर्च कमी. काय ?)

४. आजवर जेवढी मराठी साहित्य संमेलने झालीत त्यातून मराठीचा उद्धार झाल्याचे आकडे काही केल्या मिळत नाहीयेत. उलट, दर वर्षी महाराष्ट्रातील घटणाऱ्या मराठींच्या संख्येविषयीच ऐकिवात आलेले आहे. आता मराठी लोकांची प्रजननशक्ती कमी झाली असेल, असे मानण्यास कुणीही विज्ञानवादी तयार होणार नाही. मग, मराठी लोक कमी झाले कसे ? ह्याविषयी पुणे-३० येथीलच विज्ञानवादी म्हणतात, की मध्यमवर्गीय मराठी मुले अमेरिकेत गेल्यामुळे, मराठींची महाराष्ट्रातली संख्या कमी झाली आहे. असे जर असेल, तर जिथे मराठी लोकांची संख्या वाढते आहे, तिथे मराठी साहित्य संमेलन व्हायला हवे, नाही का ? आपल्या मराठी संस्कृतीची हेळसांड करून उगाच स्वत:च्या आर्थिक वृद्धीसाठी अमेरिकेला गेले्या ह्या मुला/मुलींना आता पुन्हा मराठी साहित्यात गोडी निर्माण करणे आवश्यक अाहे, नाही का ? एकदा का त्यांना “एक उलट एक सुलट” छाप साहित्यात गोडी निर्माण केली, की नक्कीच ती मुले/मुली पुन्हा महाराष्ट्रात परत येतील, आणि महाराष्ट्र धर्म वाढीला लागेल. लोकहो, ह्या उपसागरीय भागातील तथाकथित मराठी लोकांना, फक्त पुलं आणि वपु ह्या तद्दन भिकार (अर्थातच लोकप्रिय) लेखकांपासून दूर करणे (सदर लेखकांना साहित्यिक म्हणणे हे म्हणजे साहित्य ह्या संज्ञेचाच अपमान आहे) हे मराठी कला आणि संस्कृतीच्या जपणुकीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी येथे जीवनातील भयाण गोष्टींवर प्रकाश टाकणारे नवकवी, चारोळ्याकार, दोनोळ्याकार वगैरे सगळे ख्यातनाम साहित्यिक येणे आवश्यक आहे. एकदा हे सर्व साहित्यिक येथे आले, त्यांच्या सरकारी तिकिटांतून, येथील सर्व तथाकथित रसिकांना गाई-गाई करून गेले, की साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट सफल झाले.

थोडक्यात, जे सर्वसाधारण लोकंाना आवडते, ह्याला साहित्य म्हणता येत नाही. साहित्य ते, जे लोकांना झोपी घालते. ह्यापूर्वी इंदूरला झालेल्या साहित्य संमेलनात इंदूरच्या ७० टक्के तथाकथित मराठी लोकांना झोपवण्यात सदर साहित्य संमेलन यशस्वी झाले होते. आता संधी आहे ९० टक्‌क्यांची ! त्यामुळे संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात सदर साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे. येथील माहितीतंत्रज्ञान (आय टी) विभागात काम करणाऱ्या हजारो मराठी युवक-युवतींकडे ह्या साहित्य संमेलनावर खर्च करण्यासाठी पैसे आहेतच, पण मुख्य म्हणजे त्यांना झोपेची गरजही आहे. बिचारे रात्रंदिवस उगाच काम करतात, स्वत:चे पोट भरण्यासाठी. छान साहित्यिक वगैरे झाले असते, तर ?

एक उलट एक सुलट….

शोधयंत्राचा शोध - भाग ११: एका महासत््तेचा उदय

December 5th, 2007

शोधयंत्राचा शोध घेता घेता आपण पोहोचलो आहोत १९९७ मध्ये. स्थळ, अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरच्या उत्तर कॅलिफोर्नियातील उपसागरीय भागातले (बे एरिया, सिलिकॉन व्हॅली) एक विद्यापीठ, स्टॅनफोर्ड. येथे संगणक विज्ञानात पीएचडी करण्यासाठी आलेले दोन विद्यार्थी, लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन. त्यांच्यापेक्षा दोनच वर्षांनी त्याच विद्यापीठात वरिष्ठ असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे, डेव्हिड फायलो आणि जेरी यांग, ह्यांच्या महाजालाच्या नवीन तंत्रज्ञानाधारित संस्थेचे यश ह्या दोघांनी जवळून पाहिलेले होते. आणि त्यांच्या वाढत्या संस्थेला, याहू! ला, महाजालाचे वर्गीकरण मानवी मदतीने करताना झालेले कष्टदेखील त्यांना जवळून पहायला मिळालेले होते. ह्या काळात याहूचे शोधयंत्र सर्वात प्रगत असले, तरी हे शोधयंत्र संकेतस्थळाच्या पृष्ठांत असलेल्या शब्दांवरूनच त्या संकेतस्थळांचे वर्गीकरण करायचे.

म्हणजे, समजा तुम्ही तेव्हा “बिल क्लिंटन” असा शोध त्या शोधयंत्रातून घेतला असता, तर याहू!कडे नोंद असणाऱ्या सर्व संकेतस्थळांतील पृष्ठांतील, ज्या पृष्ठांत सर्वाधिकवेळा “बिल क्लिंटन” असे लिहिलेले आहे, ती पृष्ठे तुम्हाला दिसली असती. पण, ही पृष्ठेच तुम्हाला हवी आहेत, हे कसे ठरवायचे ? ज्या पृष्ठावर “बिल क्लिंटन” असे सर्वाधिक वेळा लिहिले आहे, तेच शोधकर्त्याला हवे असलेले पृष्ठ आहे, हे कशावरून ? समजा, मी, म्हणजे एका सामान्य (पण बुद्धिमान, किंवा “चालू”) संकेतस्थळचालकाने विचार केला, की बिलबुवांनी मोनिककाताईंशी लफडे केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे, त्यामुळे बिल क्लिंटन आणि मोनिका लुविनस्की, ह्यांचा शोध याहू! वर विश्वजालाचे प्रवासी मोठ्या प्रमाणात घेणार, हे नक्की. म्हणून माझ्या संकेतस्थळावर ते प्रवासी यावेत (आणि माझ्या संकेतस्थळावरच्या जाहिराती त्यांनी पाहाव्या) म्हणून, मी माझ्या संकेतस्थळावर एक पृष्ठ असे तयार केले, की त्यात शंभर वेळा बिल क्लिंटन आणि शंभर वेळा मोनिका लुविनस्की लिहिले. त्या संकेतस्थळाची याहू! वर नोंद केली. जगातील याहू! वर नोंद झालेल्या इतर कुठल्याही संकेतस्थळापेक्षा, माझ्या ह्या संकेतस्थळावर बिल क्लिंटन हे नाव अधिक दिसते, म्हणून याहू!चे शोधयंत्र माझे संकेतस्थळ त्यांच्या शोधनिकालांत अधिक वर दाखवेल, आणि विश्वजालावरचे अनभिज्ञ प्रवासी माझ्या संकेतस्थळाला भेट देतील.

पण, ते नक्कीच निराश होतील. कारण, जेव्हा ते “बिल क्लिंटन” चा शोध घेतात, तेव्हा त्यांना हवी असते बिल क्लिंटनची माहिती. पण ती तर माझ्या स्थळावर अजीबात नाही ! त्यात आहे फक्त शंभर वेळा “बिल क्लिंटन” असे लिहिलेले! स्वत:ला हवी असलेली माहिती शोधयंत्रातून मिळाली नाही, की ते शिव्या देतात शोधयंत्राला, खरे ना ?

हे असे कसे मूर्ख शोधयंत्र, ज्याला मला काय हवे तेदेखील कळत नाही ?

आणि त्यामुळे, शोध घेणाऱ्याला नक्की काय हवे आहे, हे समजून घेणे, ही शोधयंत्राची गरज बनते. आणि दुसरी महत्वाची गरज अशी की जे शोध घेणाऱ्याला हवे आहे, त्याचीच माहिती देणारी संकेतस्थळांवरची पृष्ठे त्याला दाखवायची.

अर्थातच, कुठल्याही शोधयंत्राला दोन समस्यांचे समाधान शोधणे आवश्यक ठरते:

१. शोधयंत्राच्या ग्राहकाला काय हवे आहे ?
२. स्वत:कडे असलेल्या संकेतपृष्ठांपैकी कुठली पृष्ठे त्याची गरज भागवतात ?

लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन, ह्यांनी वरच्या दोन समस्यांपैकी दुसऱ्या समस्येला हाताळायचे ठरवले.

“बिल क्लिंटन” असे नाव असणारी लाखो पृष्ठे संकेतस्थळांवर विखुरलेली असतील. त्यातील “बिल क्लिंटन” विषयी माहिती असलेली पृष्ठे कोणती, हे कसे ओळखावे ? इथे विषयोचितता (रिलेव्हन्स, relevance) ही संकल्पना उदयास येते. करोडो संकेतपृष्ठांतून विचारलेल्या माहितीस कुठले संकेतपृष्ठ सर्वाधिक उचित आहे ? हे संगणकाद्वारे ठरवणे, म्हणजे विषयोचिततेच्या संगणनाचे मुख्य उद्दिष्ट.

त्यावेळी, जगातील संकेतपृष्ठांपैकी ९९ टक्के पृष्ठे ही इंग्रजी भाषेत होती (आता ७० टक्के असतील). ह्या पृष्ठांत नक्की काय लिहिले आहे, हे कळण्यासाठी संगणकांना इंग्रजी शिकवणे आवश्यक आहे. पण गेली चाळीस वर्षे संगणकांना इंग्रजी शिकवता शिकवता अनेक सुपीक डोकी निकामी झालीत! संगणकांना इंग्रजी येण्याची वाट पहात राहिले असते, तर लॅरी आणि सर्जी म्हातारे आणि कंगाल राहिले असते! कुठलातरी नवीन (आणि सोपा) मार्ग शोधायला हवा, हे त्यांना कळले. आणि त्यांनी ह्या कठीण समस्येला एक समाधान शोधून काढले. त्या संकल्पनेचे नाव आता सर्वश्रुत आहे (किमान बहुश्रुत तरी आहे) : पेजरॅंक !

प्रत्येक संकेतपृष्ठावर काही शब्द असतात. पण सदर पृष्ठ सदर शब्दांसाठी माहितीपूर्ण आहेत का, हे ठरवण्यासाठी त्या पृष्ठाला त्या शब्दासंदर्भात दिलेले गुण, म्हणजे “पेजरॅंक”. अर्थात ही त्या संज्ञेची दहा वर्षानंतरची व्याख्या झाली. १९९७ मध्ये लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन ह्यांनी पेजरॅंकची जी व्याख्या केली, त्यात आजच्या व्याख्येतले “शब्दासंदर्भात” हे गाळलेले होते. एका संकेतपृष्ठाची एक पेजरॅंक, त्या पृष्ठातील सर्व शब्दांसाठी ही एकच!

वाचकहो, ही लेखमाला प्रकाशित करायला सुरुवात केल्यानंतर आपल्यातल्या अनेक बुद्धिमान वाचकांनी माझ्याशी संपर्क साधून, त्यांना येणाऱ्या विविध कल्पना, इतरांना आधीच आलेल्या आहेत, म्हणून माझ्याकडे खेद व्यक्त केला आहे. त्या सर्वांना मी ह्या उदाहरणातून एक दिलासा देऊ इच्छितो. (मलाही माझ्या नवीन वाटणाऱ्या कल्पना, इतरांनाही आधिच आलेल्या आहेत, हे शोधयंत्राच्या माध्यमातूनच कळते, पण त्यामुळे मी उदास होणे सोडून दिलेले आहे. उलट, आपल्याला आलेली कल्पना आधीदेखील कुणाला तरी आलली आहे, म्हणजेच त्या कल्पनेत “दम” आहे, हे कळून मला समाधान वाटते.)

पेजरॅंक ही कल्पना लॅरी आणि सर्जे ला सुचली, त्या आधीच इंकटुमी, कॉम्पॅक ह्या संस्थांनी ह्या कल्पनांवर संशोधन सुरू केले होते. इंकटुमीमध्ये तर अशा प्रकारच्या विषयोचिततेच्या प्रकल्पावर कामदेखील सुरू झाले होते. त्याला त्यांनी नाव दिले होते, “वेबमॅप”. अख्ख्या संकेतपृष्ठांचे जाळे संगणकावर बांधण्याचा हा प्रकल्प. पण हा प्रकल्प एका प्रस्थापित संस्थेत सुरू होता, आणि लॅरी आणि सर्जे असाच प्रकल्प करत होते, ते त्यांच्या होस्टेलच्या खोलीत. तुम्ही सिलिकॉनव्हॅलीच्या बाहेर असलात, तर तुम्हाला नक्की वाटणार की दोन विद्यार्थी, त्यांच्या खाजगी संगणकावर कुणीही एक कवडीची मदत न करता जो प्रकल्प करताहेत, त्याचा नक्की भुगा होणार ! पण इथे असे घडत नाही.

अर्थातच, बहुतांश प्रस्थापित कंपन्यांची बाबूशाही (ब्युरोक्रसी) इंकटुमीतल्या संशोधकांनाही भोवली, आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वसतीगृहात दरमहा १२०० डॉलर्सवर काम करणाऱ्या ह्या दोन विद्यार्थ्यांनी आपला पेजरॅंकचा कृतिक्रम इंकटुमीच्या संशोधकांच्या (पगार दरमहा १०००० डॉलर्स) आधी अमलात आणला, आणि एका महासत्तेचा जन्म झाला.

(पुढच्या लेखात आपण पेजरॅंक ह्या संकल्पनेविषयी जाणून घेऊयात. पण त्या आधी लॅरी आणि सर्जे ह्यांनी त्याविषयी लिहिलेला शोधनिबंध शोधयंत्रावरून शोधा. वाचण्याचा प्रयत्न तरी करा. तो वाचताना, तुमच्या रोजच्या जीवनात पेजरॅंक सारखे कृतिक्रम दिसतात का, ह्याचा विचार करा. मग पुढचा लेख वाचणे खूप सोपे जाईल.)

शोधयंत्राचा शोध - भाग १०: प््रभावळी

December 3rd, 2007

आपण एखादी नवीन कंपनी काढावी हे कुणाला का वाटते? ह्याचे उत्तर आपल्याला आजवर स्थापन झालेल्या संस्थांतून सापडते. आपण काही उदाहरणांतून ह्याचा आढावा घेऊ.

पहिले उदाहरण देतो ते अॅपलचे. स्टीव्ह जॉब्ज तेव्हा कुठल्यातरी महाविद्यालयात विद्यार्थी होता. त्याचा वयाने मोठा मित्र स्टीव्ह वोझ्नियाक हा ह्यूलेट-पॅकार्ड (एच-पी) ह्या कंपनीत कॅल्क्यूलेटर बनवायचा. मोटरोलाने जेव्हा त्यांचा पहिला सूक्ष्मप्रक्रियक बाजारात आणला, तेव्हा वॉझ (वोझ्नियाक चे टोपणनाव) त्यामुळे पेटलाच. आपल्याला स्वत:ला त्यातून कॅलक्यूलेटरच्या पेक्षाही काहीतरी चांगले स्वत:चे करता येऊ शकेल, असे यंत्र ह्या सूक्ष्मप्रक्रियकातून बनवता येईल, असे त्याला वाटले. त्याने त्याच्या मित्राला (जॉब्जला) ते सांगितले. जॉब्जकडे त्याच्या आईने त्याला घेऊन दिलेली एक फोक्सवॅगन होती. ती त्याने विकली. त्यातून जे दहा हजार डॉलर्स मिळाले, त्यातून उपकरणे खरेदी करून आईच्याच घरातल्या गराजमध्ये अॅपलची स्थापना झाली. हे दोघे मित्र तेथे जमून मोटरोलाच्या सूक्ष्मप्रक्रियकावर आधारित स्वीय संगणक बनवायला लागले.

दुसरे उदाहरण आपण बघूया ते मायक्रोसॉफ्टचे. विलियम हेन्री गेट्स (तिसरा), हा बोस्टनजवळच्या हार्वर्ड विद्यापीठातला दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर, सीअॅटल नावाच्या शहरातला हा विद्यार्थी पूर्वेला पहिल्यांदाच दीर्घकाळासाठी रहायला गला. त्याचा मित्र पॉल अॅलन हा मात्र अजूनही सिअॅटललाच होता. पॉप्युलर मेकॅनिक्स ह्या मासिकात त्यांनी एका सूक्ष्मसंगणकाची जाहिरात वाचली. आणि संगणकसृष्टीचे हे भविष्य आहे, हे त्यांना कळले. ह्याचा खूप उपयोग पुढे होऊ शकेल, हे मनात आले. आणि त्यावर ज्या आज्ञावली वापरण्यात येतील त्या स्वत: तयार करण्याऐवजी कदाचित लोक तयार आज्ञावली विकत घेतील असे वाटले. आपण ह्या आज्ञावली विकू शकतो, हा विचार मनात ह्या दोघांच्या मनात आल्याने मायक्रोसॉफ्ट निर्माण झाली.

अशी अनेक उदाहरणे आहेत. पुढच्या काळात, मोठ्या कंपन्यात वर्षोनवर्षे काम करणारे एखाददोघे सहकारी, मित्र त्याचत्या कामांमुळे कंटाळतात. त्यांना नवनवीन कल्पना येतच असतात. पण त्या कल्पनांची दखल ही मोठी कंपनी घेत नाही. पण ह्या कल्पना भविष्यात खूप महत्वाच्या ठरतील, म्हणून हे दोघे बाहेर पडतात. आजवर आपण साचवलेल्या धनाचा उपयोग करून ती कल्पना साकार करण्यासाठी मनोभावे प्रयत्न करतात. पण यापुढे काय होते, ते मात्र अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. कारण इतर ठिकाणी हा उपक्रम व्यर्थ जाईल. दोन तरुण मुले, त्यांना काय कळणार व्यवसायातलं? असा विचार करून जग त्यांना खच्ची करेल. पण वयाकडे लक्ष न देता, उपक्रमाकडे जास्त लक्ष देणं हे अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरच्या ह्या छोट्याशा भागाचं मुख्य लक्षण म्हणावं लागेल.

दरवेळी कुठल्या मोठ्या व्यावसायिक संस्थेतूनच असे लोक बाहेर पडायला हवेत असे नाही. बरेचदा, शैक्षणिक संस्थांतूनदेखील ‘आपण इतरांना शिकवत असताना, आपल्याला ही कल्पना सुचलीय, त्यातून जग बदलता येतेय का हे बघावे’ म्हणून बाहेर पडलेले प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थीदेखील अमेरिकेत अशा प्रभावळी (स्टार्ट-अप कंपन्या) स्थापन करताना आपल्याला दिसतात. इंकटूमी, ही त्याच विचारातून स्थापन झालेली संस्था. पण ह्या संस्थेतून काहीही पैसे मिळत नसताना, ही संस्था चालवायची म्हणजे संस्थापकांकडे भक्कम रक्कम जमा असायला हवी, नाही का?

असा विचार मनात येणे साहजीकच आहे. कारण सिलिकॉन व्हॅलीचे गणित आपल्याला पुरते कळलेले नाही. सिलिकॉन व्हॅलीतल्या एका छोट्या संस्थेशी माझा तिच्या जन्मापासून संबंध आलाय. तिचा संस्थापक माझा जीवश्चकंठश्च मित्रच म्हणा ना. त्या अनुभवावरून आणि आजवर येथील कंपन्यांबद्दल वाचलेल्या बातम्यांवरून यशस्वी कंपन्यांबद्दल थोडे लिहू इच्छितो.

तंत्रज्ञानावर आधारित कंपनी कशी सुरू होते? बहुतेक वेळा, मोठ्या कंपन्यात उच्च भूमिकेत काम करणारे दोघेजण आपल्याला इथे (म्हणजे सध्याच्या कंपनीत) आता वाढीला जागा (स्कोप) नाही, असे ठरवतात. त्या मोठ्या कंपनीत, कुठल्या तंत्रज्ञानाला जास्त वाव मिळत नाही, ते त्यांच्या लक्षात आलेले असते. त्या तंत्रज्ञानाची आणखी कुणाला गरजा आहे, हा विचार आधीच झालेला असतो. पण ह्या कंपनीच्या व्यवस्थापनाला ते तंत्रज्ञान महत्वाचे वाटत नाही, हा क्षोभही असतो.

त्यामुळे हे दोघे बाहेर पडतात. आपले आजवरचे अर्थसंचयन आपल्याला एक-दोन वर्षे उपयोगी पडेल, असा विचार करून. घरातल्या संगणकांवर हे तंत्रज्ञान अधिक विकसीत करतात. कुणाला दाखवायचे झाले, तर त्यांना त्याबाबतीत अचंबा वाटावा, एवढे. हे झाले प्रात्यक्षिक (डेमो). आता जगातल्या इतर लोकांना हे तंत्रज्ञान वापरता यावे, म्हणून त्यावर अधिक आज्ञावलीकार नियुक्त करणे आले. ह्यासाठी पैसे लागणार. पगाराशिवाय लोक काम करणार नाहीत. मग हे पैसे कुठून मिळवावेत? ह्यासाठी आपले जुने कॉन्टॅक्ट्स वापरावे लागतात. हे कॉन्टॅक्ट्स असे हवेत, की त्यांच्याकडे पैसे तर असायला हवेतच, पण त्यांना आपण विकसीत करीत असलेल्या तंत्रज्ञानाचे महत्वही कळायला हवे. आपल्या जुन्या कंपनीतले आपले वरिष्ठ आपल्यापेक्षाही जास्त कमवत असंत, नाही का? जरी त्या कंपनीत त्यांनी आपण मांडलेल्या भूमिकेला पाठींबा दिला नाही, तरी त्यांना ह्या तंत्रज्ञानाविषयी माहिती आणि त्याचे महत्व कळलेले आहेच. त्यांनाच मदत मागितली, तर काय बिघडले? पण त्या लोकांना ह्या आर्थिक मदतीबद्दल द्यायचे काय ? कारण आपल्या कंपनीचे उत्पन्न सध्यातरी एक मोठे शून्य आहे. मघ असे केले तर? ही कंपनी जेव्हा विकली जाईल, तेव्हा त्याचा २० टक्के भाग तुमचा. असे ष्ट्यांपपेपरवर लिहून दिले तर ?

म्हणजे, ह्या नवीन संस्थेचे, जिचे अजून नावही ठरायचे आहे, शंभर समभाग केलेत, आणि त्यातील वीस समभाग जे आर्थिक पुरवठा करतोय त्याला दिले, आणि उरलेले अंशी समभाग दोन संस्थापकांनी विभागून घेतले, चाळीस-चाळीस असे. हा असा पहिला पुरवठेदार जो असतो, त्याला म्हणतात ऍंजेल इन्वहेस्टर (आद्य गुंतवणुकदार). हा रग्गड श्रीमंत असणे आवश्यक आहे, कारण, छोटे गुंतवणुकदार छोट्या छोट्या कारणांनी आपले गुंतवलेले पैसे काढून घेऊ इच्छितात. आपल्या संस्थेला पूर्ण अर्थपुरवठा करणाऱ्या व्यक्तीने, स्वत:ला अडचण आली म्हणून, आपला वाटा दोन-तीन महिन्यात काढून घ्यायचे ठरवले, तर चालेल का? म्हणून गुंतवणूकीतल्या अतीव धोक्याला जी व्यक्ती स्थितप्रज्ञपणे सामोरी जावू शकते अशी व्यक्ती आपल्याला आद्य गुंतवणुकदार म्हणुन मिळवायला हवी.

चला तर मग. आपल्याला अशी एक स्थितप्रज्ञ व्यक्ती लाभलीय आपल्या संस्थेला वर्षभरासाठी अर्थसाह्य द्यायला. त्यांना आपण आपल्या भविष्यातल्या मायक्रोसॉफ्टचे २० टक्के दिले, पण त्याबद्दल त्यांनी दिलेले दोन लाख डॉलर्स वापरून आपण दोन आज्ञावलीकार कंपनीत आणले, आणि लोकांना वापरण्याजोगी आज्ञावली बनवली. आपल्या भविष्य वक्तव्याबद्दल इतर लोकही सहमत होतेच. त्यामुळे आपल्या ह्या आज्ञावलीचा वापर बऱ्याच लोकांनी सुरू केला. आपल्याला धन्य वाटले. पण ह्या सगळ्या लोकांच्या मागण्या पुऱ्या करण्यासाठी पुरेसे आज्ञावलीकार लागणार. नाही का? त्यासाठी आपल्याला आद्य गुंतवणुकदाराने दिलेले पैसे अपुरे पडायला लागले आहेत. ते पैसे जेमतेम आणखी सहा महिने पुरणार. मग आता काय करायचे ? ही आज्ञावली लोकप्रिय व्हावी म्हणून आपण ती सर्वांना फुकट उपलब्ध करून दिलेली आहे, त्या आज्ञावलीच्या वापरासाठी शुल्क निर्धारित केले, तर त्याचे वापर करणारे कमी होणार, नाही का?

ह्या अशा विभ्रमात पडल्याने आपण ही संस्था चालवण्यासाठी आणखी अर्थसहाय्य मिळवावे लागेल, हे निश्चित. पण आद्य गुंतवणुकदार आणखी अर्थसहाय्य देण्यास अनुत्सुक असतो. आणि उत्सुक जरी असला, तरी त्याला पुन्हा दोन लाख डॉलर्सची गंतवणूक करण्यासाठी आधीसारखाच अतिरीक्त २०% वाटा हवाय. ह्याचा अर्थ आपल्या कंपनीचा ४०% वाटा त्याच्याकडे जाणार, आणि दोन संस्थापकांना प्रत्येकी ३० टक्के वाट्यावर समाधान मानावे लागणार. हेदेखील एकवेळ चालेल, पण ज्यांना समभागबाजारातील खरेदीविक्रीविषयी माहिती आहे, त्यांना ह्या योजनेतील त्रुटी लगेच कळून येईल. ज्याच्याकडे कंपनीचे सर्वाधिक समभाग, त्याला कंपनीचे धोरण ठरवण्याचा अधिकार असतो. संस्थापकांनी एखादी संस्था स्वत:च्या विचारांतून आणि कष्टांनी निर्माण केलेली असते, तिचे धोरण ठरवण्याचे अधिकार संस्थापकांकडेच रहावेत. त्यातच त्या संस्थेचे भले आहे, हे कळण्याची बुद्धिमत्ता गुंतवणुकदारांकडे असावी लागते. संस्थेचे पैसे संपत आलेत, ह्या दबावामुळे काही संस्थापक आपली बुद्धी गहाण ठेवून अशा प्रकारच्या गुंतवणुकीला मान्यता देतात. परंतु त्यातून कुणाचेही भले झालेले माझ्या पाहण्यात आलेले नाही.

अशावेळी आधार मिळतो, तो नवोपक्रमकेंद्रित गुंतवणुकदारांचा (व्हेंचर कॅपिटलिस्ट). ह्यांची भूमिका मी थोडक्यात समजवून देण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच आपल्याला समजेल अशा उदाहरणातून. आपण पतपेढीत आपले संचयित पैसे जमा करतो. त्यावर आपल्याला थोडेफार व्याज मिळते. परंतु फक्त त्